संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज)
राज्यातील शासकीय कार्यालयांमध्ये ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. संगमनेर नगर परिषदेच्यावतीने देखील हा उपक्रम राबविण्यात येणार असून या उपक्रमांतर्गत शहरातील नागरिकांना विविध प्रकारच्या दाखल्यांचे वितरण केले जाणार असल्याची माहिती मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी दिली.
‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत नागरिकांना आवश्यक असणाऱ्या विविध प्रकारच्या दाखल्यांचे वितरण केले जाते. याच उपक्रमांतर्गत महसूल विभागाच्यावतीने राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील सन 2020 ते 2023 या तीन वर्षात 18 ते 59 वयोगटातील मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांना या योजनेचा लाभ देण्यासाठी आवश्यक असलेले मृत्यूचे दाखले नगर परिषदेमार्फत मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे.
इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या व ज्या बालकांचा जन्म 2018-2019 या कालावधीत झाला आहे अशा मुला-मुलींना, विद्यार्थ्यांना जन्माचा दाखलाही लगेचच वितरित केला जाणार आहे.
दारिद्र्य रेषेखालील ज्या कुटुंबांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावयाचा आहे अशा कुटुंबातील व्यक्तीचे दारिद्र्यरेषेखालील यादीत नाव असल्याबाबत अथवा नसल्याबाबतच्या दाखल्याचेही वितरण या उपक्रमांतर्गत केले जाणार आहे.
पथविक्रेत्यांसाठी असलेल्या प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजना अंतर्गत कर्जाचा लाभ घेण्यासाठी, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत नवीन बचत गटाची स्थापना, महिलांसाठी स्वयंरोजगार सुरू करण्याकरिता बँकेमार्फत कमी व्याज दराने कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, योजनांचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या लाभार्थ्यांनी बालकल्याण विभागाशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शासनाच्यावतीने शहरातील नागरिकांना ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत मोठी संधी प्राप्त करून दिलेली आहे. यासाठी संगमनेरकर नागरिकांनी संगमनेर नगर परिषदेत संपर्क करावा. या संधीचा नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन मुख्याधिकारी तथा प्रशासक राहुल वाघ यांनी केले आहे.

