संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) –
गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे शैक्षणिक हब बनलेल्या संगमनेर तालुक्यातील तीन विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पातळीवरील अत्यंत महत्त्वाच्या यूपीएससी परीक्षेत मिळवलेले यश हे संगमनेरकरांसाठी अत्यंत अभिमानास्पद आहे, असे गौरवोद्गार माजी शिक्षण व महसूल मंत्री तथा काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते, आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे.
परीक्षेत सुकेवाडी येथील सर्वसामान्य कुटुंबातील मंगेश खिलारी, मांची येथील स्वप्निल राजाराम डोंगरे आणि पिंपारणे येथील राजश्री शांताराम देशमुख या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. संगमनेर तालुक्यातील विद्यार्थ्यांनी यूपीएससी परीक्षेत मिळवलेल्या यशाबद्दल काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
या विद्यार्थ्यांनी अत्यंत जिद्द आणि आत्मविश्वासातून मिळवलेले हे यश संगमनेर तालुक्यातील सर्व विद्यार्थी आणि युवकांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे. या विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण अभ्यास आणि चिकाटी बरोबरच त्यांच्या पाठीशी सातत्याने उभे असणारे त्यांचे आई, वडील, कुटुंब, शिक्षक, मार्गदर्शक, मित्रपरिवार, यांच्यासाठीही हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांनी यूपीएससी परीक्षेतील यशाने संगमनेरच्या नाव राज्य व राष्ट्रीय पातळीवर उज्वल केले असून चांगल्या कामातून ते आपले नाव राष्ट्रीय पातळीवर नक्कीच उज्वल करतील असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला.
यशस्वी विद्यार्थ्यांचे काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, इंद्रजीत थोरात, रणजीतसिंह देशमुख यांचासह विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

