महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – दंडकारण्य अभियानांतर्गत दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी संगमनेर तालुक्यात वटसावित्री पौर्णिमेनिमित्त 1100 वटवृक्षाचे रोपण करण्यात आले असून वटवृक्षासह सर्व देव वृक्ष हे सर्वाधिक ऑक्सिजन देणारे असल्याने या सर्व वृक्षांचे नागरिकांनी संवर्धन करावे, असे आवाहन माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी केले आहे.
दंडकारण्य अभियानांतर्गत तालुक्यातील विविध ठिकाणी वटवृक्षांचे रोपण व पूजन करण्यात आले. तसेच संगमनेर तालुक्यात सौ दुर्गाताई तांबे यांच्या उपस्थितीत खांडगाव, कर्हे, निमोण, पिंपळे, नान्नज दुमाला, पारेगांव बु, सोनोशी, पोखरी हवेली, मालदाड येथे वटपूजन व वृक्षारोपण करण्यात आले.
तांबे म्हणाल्या, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या दंडकारण्य अभियानाचा तालुक्यात मोठा विस्तार झाला आहे. यामध्ये नागरिकांचाही मोठा सहभाग आहे. वटसावित्री पौर्णिमेला भारतीय परंपरेत मोठे स्थान असून यानिमित्त देव वृक्षांची आपण पूजा करतो. हे वृक्ष सर्वाधिक ऑक्सिजन देणारे आहेत. दंडकारण्य अभियानाअंतर्गत प्रत्येक गावात 5 वटवृक्षांचे रोपन करतो. यावर्षीही आपण 1100 वटवृक्षांचे रोपन केले आहे. तालुक्यातील महिला पदाधिकारी यांनी प्रत्येकी 10 याप्रमाणे गावांत वटवृक्षांचे रोपन केले आहे. स्थानिक नागरिकांवर या वृक्षसंवर्धनाची जबाबदारी देण्यात आली.
पुढील पिढ्यांसाठी आपल्याला ऑक्सिजनची कमतरता भासू नये याकरता सर्वांनी वृक्षांचे रोपण, संवर्धन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामध्ये पिंपळ, वड, उंबर,आंबा, कडूनिंब, चिंच या वृक्षांचे रोपण व संवर्धन करणे अत्यंत गरजेचे आहे. त्याचबरोबर महिलांना आपल्या घराचा व सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवून पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धनही करणे गरजे आहे. ग्लोबल वार्मिंगची वाढती समस्या कमी करण्यासाठी सर्वांनी वृक्ष संवर्धन करून हिरवाई निर्माण करावी असे आवाहन त्यांनी केले.
प्रा. खरात म्हणाले, माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखालील दंडकारण्य अभियानाने संगमनेर तालुक्याची राज्यात ओळख आहे. यावर्षीही सर्वांनी दंडकारण्य अभियानात सक्रिय सहभाग घेत हिरवी वनराई अधिक समृद्ध करण्यासाठी काम करावे.
अर्चना बालोडे, सुनंदा जोर्वेकर, मिनाक्षी थोरात, बेबी थोरात, वंदना गुंजाळ, सुनंदा कांदळकर, ज्योती कडलग, हौसाबाई गुंजाळ, ममता गुंजाळ यांच्यासह सामाजिक वनीकरण अधिकारी सोनाली गिरी, मधुकर गुंजाळ, रमेश गुंजाळ, प्रभाकर गुंजाळ, रघुनाथ गुंजाळ, सरपंच भारत गुंजाळ, पंचायत समितीचे अधिकारी बाळासाहेब लावरे, रामराव कडलग, मदन शेवाळे, प्रा. बाबा खरात, बाळासाहेब फापाळे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.

