समाज माध्यमांवर जातीवाचक मेसेज अफवा पसरविणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार
महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – मंगळवारी संगमनेरमध्ये निघणाऱ्या भगवा मोर्चाला पोलीस प्रशासनाने अद्याप परवानगी दिलेली नाही ही परवानगी ऐनवेळी दिली जाऊ शकते. या पार्श्वभूमीवर संयोजकांकडून वेळोवेळी आढावा घेतला जात आहे. दरम्यान संगमनेर बंदचे कोणतेही नियोजन नसल्याचे संयोजकांनी स्पष्ट केले आहे. बंदची अशी कोणतीही सक्ती करता येणार नसल्याने व्यावसायिकांनी मंगळवारी आपले व्यवसाय सुरू ठेवावेत, अशी माहिती संगमनेरचे नूतन पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.
राज्यात हिंदूंच्या सणांवर होणारे हल्ले, दिल्लीत साक्षीची जिहादींकडून झालेली हत्या आणि शहरातील जोर्वे नाका येथे जोर्वे गावातील आठ हिंदू तरुणांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ मंगळवारी (6 जून) सकल हिंदू समाजाने भगवा मोर्चाचे आयोजन केले आहे. या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने उपाधीक्षक वाघचौरे यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
वाघचौरे म्हणाले, जोर्वे नाका घटनेनंतर पोलीस प्रशासन सतर्क झाले असून या घटनेतील दोषींवर वेळीच कारवाई करण्यात आली आहे. शहरात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क आहे. कोणताही गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही. मोर्चाला प्रशासनाने अद्याप तरी परवानगी दिलेली नसून मोर्चा संदर्भातील संयोजकांचे नियोजन, मोर्चाचा मार्ग, मोर्चासाठी येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांच्या सुविधा, मोर्चाचा मार्ग या दृष्टीने प्रशासन आढावा घेत आहे. संयोजकांकडून संगमनेर बंद पुकारण्यात आलेला नाही. फक्त मोर्चा काढला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
मात्र समाज माध्यमांवर संगमनेर बंद आशयाचे चुकीचे मेसेज फिरत आहे. अशाप्रकारे जबरदस्तीने कोणीही संगमनेर बंदचा प्रयत्न केला, व्यावसायिकांना जबरदस्तीने व्यवसाय बंद करावयास लावले तर अशा लोकांवर कडक कारवाई केली जाणार आहे. मोर्चाला देखील प्रशासनाने अद्याप परवानगी दिली नसून ऐनवेळी या संदर्भात विचार केला जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मोर्चादरम्यान होणारी भाषणे, घोषणा, झेंडे यावर देखील प्रशासनाचे लक्ष राहणार आहे संयोजकांना देखील त्या दृष्टीने काळजी घ्यावी लागेल. मोर्चा संपल्यानंतर परत जाणाऱ्यांवर देखील पोलिसांचा कडक वॉच असेल. बऱ्याच घटनांमध्ये अशा प्रकारे आंदोलनानंतर परत जाणाऱ्या आंदोलकांकडून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे समोर आले आहे. समाज माध्यमांवर चुकीचे मेसेज व्हायरल करणे, अफवा पसरविणे यावर देखील पोलीस प्रशासनाचे लक्ष राहणार असून अशा लोकांवर तातडीने गुन्हे दाखल केले जाणार असल्याचे देखील वाघचौरे यांनी स्पष्ट केले.

