महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – समनापुर (संगमनेर) येथील दगडफेक दंगल प्रकरणी अटक करण्यात आलेल्या १७ आरोपींना शुक्रवारी दोन दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर संगमनेरच्या न्यायालयाने प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. तसेच जामीन अर्ज मंजूर करतांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एम. वाघमारे यांनी सर्व आरोपींना या प्रकरणी न्यायालयात आरोपपत्र दाखल होईस्तोवर पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याची अट घातली आहे.
संगमनेरमधील भगवा मोर्चा संपल्यानंतर पुन्हा परतणाऱ्या काही मोर्चेकर्यांनी शहराजवळील समनापुर मध्ये दुसऱ्या समुदायांच्या घरांवर दगडफेक मारहाण करण्याचा प्रकार घडला होता. यात तिघेजण जखमी झाले होते. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी समोर आलेल्या व्हिडिओच्या आधारे राहाता तालुक्यातील पाच जणांसह संगमनेर तालुक्यातील बारा जणांना अटक केली होती.
शुक्रवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर सर्व आरोपींना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एम. वाघमारे यांच्यासमोर उभे करण्यात आले होते. यावेळी आरोपींच्या वकिलांनी हा प्रकार उत्साहाच्या भरात घडल्याचे नमूद करत आरोपींची स्वच्छ पार्श्वभूमी त्यांचे भविष्य या मुद्द्यावर युक्तिवाद करत त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यासह जामीनावर सुटका करण्याची मागणी केली होती. सरकार पक्षाचा आणि आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सर्व आरोपींना पंधरा हजार रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर सोडण्याचे आदेश दिले. सुटकेपूर्वी सर्व आरोपींनी आपल्या नातेवाईकांचे संपर्क क्रमांक व पत्ता देण्यासह आरोपपत्र दाखल होईस्तोवर महिन्याच्या शेवटच्या मंगळवारी शहर पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याची अट घातली आहे. पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केले त्यावेळी न्यायालय परिसरात आरोपींच्या नातेवाईकांसह सकल हिंदू समाज भगवा मोर्चाचे आयोजक व कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. 

