महाराष्ट्र संवाद न्यूज
हिरालाल पगडाल
साने गुरुजींचा जन्म २४ डिसेंबर १८९९ रोजी कोकणातील पालगड येथे झाला. आयुष्यभर अज्ञान, विषमता, पारतंत्र्य याच्याविरोधात संघर्ष करणाऱ्या गुरुजींनी ११ जून १९५० रोजी स्वतःला मृत्यूच्या स्वाधीन केले. साने गुरुजी क्रांतिकारक होते, लढवय्ये होते, व्यक्तिमत्वाला अनेक पदर होते पण त्यांचे व्यक्तिमत्त्व रणझुंजार असतांना, करुणा वात्सल्य नम्रता प्रेम या चौकटीत गुरुजींची प्रतिमा बंदिस्त करण्यात येथील व्यवस्थापती यशस्वी झाले.
साने गुरुजी म्हंटले की सगळ्यात अगोदर समोर येते ती म्हणजे श्यामची आई. याच श्यामची आईमुळे साने गुरुजींची प्रतिमा मातृहृदयी अशी निर्माण झाली. आजही मराठी सारस्वतात श्यामची आई हेच सर्वाधिक लोकांनी वाचलेले पुस्तक आहे. आचार्य अत्रेंनी १९५२ साली श्यामची आई हा चित्रपट काढला. तो तुफान लोकप्रिय झाला. त्याला भारतातील पहिला सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. अत्रेंनी साने गुरुजींना मातृप्रेमाचे मंगल स्तोत्र असे संबोधले आणि महाराष्ट्राच्या जनसामान्यांमध्ये हि प्रतिमा घट्ट रुतून बसली. हि प्रतिमा काही अंशी खरी असली तरी आम्ही राष्ट्र सेवा दलाचे सैनिक स्वतःला साने गुरुजींचे धडपणारे लेकरू म्हणवून घेतो, ते केवळ गुरुजी मातृहृदयी आहेत म्हणून नव्हे तर त्यांच्या जीवनाचे इतरही अनेक पैलू आहेत आणि ते पैलु अधिक प्रभावी आहेत. त्याचा आमच्यावर प्रभाव आहे.
पदवी प्राप्त केल्यावर गुरुजी तत्वज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी अंमळनेरला गेले. तो मधेच सोडून देऊन ते शिक्षक बनले. अंमळनेरच्या शाळेतील विद्यार्थ्यांशी एकरूप झाले. त्याचवेळी त्यांच्यावर महात्मा गांधी यांच्या विचारांचा प्रभाव पडला. १९३० साली त्यांनी शिक्षकी पेशाचा त्याग केला आणि स्वतःला महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंग चळवळीत झोकून दिले.
महात्मा गांधींनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आदेश दिला, खेड्याकडे चला. त्यासाठी १९३६ साली काँग्रेसचे अधिवेशन देशात प्रथमच खान्देशातील फैजपूरसारख्या खेड्यात घेण्याचे निश्चित झाले. साने गुरुजींनी या अधिवेशनाला शेतकरी वर्ग अधिकाधिक हजर राहावा यासाठी खेडोपाडी फिरून अधिवेशनाचा प्रचार केला.
आता उठवू सारे रान,
आता पेटवू सारे रान
शेतकऱ्यांच्या राज्यासाठी
लावू पणाला प्राण
हे गीत रचले, गावोगावी हे गीत शेतकऱ्यांच्या मुखोदगत झाले. हे गीत आजही हिट आहे. शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचे स्फूर्तीगीत बनले. गुरुजींची स्वातंत्र्य सैनिकाची ओळख समाजाला फारशी परिचित नाही. गुरुजींना स्वातंत्र्य आंदोलनात अनेकवेळा तुरुंगवास भोगावा लागला. तुरुंगवासात त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. देशातील व परदेशातील अनेक मान्यवर लेखकांच्या पुस्तकांचा मराठीत अनुवाद केला. गुरुजींना मराठीशिवाय तमीळ, इंग्लिश, संस्कृत, उर्दू इत्यादी भाषांचे ज्ञान होते. ते बहुभाषिक होते. त्यांनी आंतरभारती हि संकल्पना राबवून सर्व भाषिक लोकांचे एकमेकांशी सलोखा, संवाद, संपर्क वाढेल असा प्रयत्न केला.
गुरुजींचा जगातील अनेक संस्कृती आणि धर्म यांचा अभ्यास होता. त्यावर त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. गुरुजींना अनेक देशांचा इतिहास ज्ञात होता. धर्म, साहित्य, संस्कृती आणि इतिहास यांचे अभ्यासक हि गुरुजींची ओळख फार थोड्यांना ज्ञात आहे.
खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, हि मराठीत अजरामर झालेली प्रार्थना गुरुजींनी महाराष्ट्राला दिलेली खूप मोठी देणगी आहे. धर्माचा अर्थ एवढा सोपा सुलभ करून सांगणारी दुसरी कोणतीही प्रार्थना नाही. १९४२ ला महात्मा गांधींनी इंग्रजांना चलेजावचा इशारा दिला. भारताच्या स्वातंत्र्यासाठी करेंगे या मरेंगेचा निर्धार करण्यात आला. इंग्रजांनी महात्मा गांधी आणि काँगेस नेत्यांना अटक केली. साने गुरुजी भूमिगत झाले. भूमिगत राहून इंग्रज सरकारविरोधात क्रांतिकारी कारवाया सुरु केल्या. सरकारविरोधात क्रांतीचे रणशिंग फुंकले. क्रांतिकारी विचाराचा प्रसार केला. अनेक बुलेटिनमधून ब्रिटिश सरकार उलथून लावण्यासाठी जे प्रयत्न ते करीत होते त्यात जनतेने सहभागी व्हावे असे आवाहन केले. गुरुजी क्रांतिकारक होते परंतु त्यांची क्रांतिकारक हि प्रतिमा महाराष्ट्रापुढे आम्ही नेण्यात कमी पडलो.
पंढरपूरच्या पांडुरंगाचे (विठ्ठल) दर्शन सर्व जाती धर्माला खुले नव्हते. अस्पृश्यांना पांडुरंगाच्या मंदिरात प्रवेश नव्हता. पंढरीचा पांडुरंग (विठ्ठल) सर्वांचा आहे. त्याच्या मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश दिला पाहिजे या मागणीसाठी पांडुरंग सदाशिव साने गुरुजी पंढरपुरात आमरण उपोषणास बसले.
एका पांडुरंगाच्या उपोषणाने दुसरा पांडुरंग १० मे १९४८ ला सर्वांसाठी खुला झाला. अस्पृश्यताविरोधी गुरुजींचा हा संघर्ष महाराष्ट्राला नवी दिशा देऊन गेला. अस्पृश्यता निर्मूलन कार्यक्रमात पुरोगामी महाराष्ट्र आघाडीवर राहिला. गुरुजींचे हे समाजसुधारकांचे कार्य खूप मोठे असूनही समाज सुधारकांच्या यादीत गुरुजींचे नाव दिसत नाही. १९४८ मध्ये गुरुजींनी साधना साप्ताहिक चालू केले. ते त्याचे संपादक होते. सा. साधनाचे माध्यमातून गुरुजींनी केलेली पत्रकारिता आजही दुर्लक्षित आहे.
गुरुजी म्हणत राष्ट्र सेवा दल हा माझा प्राणवायू आहे. आपण जर स्वतःला साने गुरुजींचे धपडणारे लेकरू समजतो तर आपल्याला आज देशात चालू असलेल्या धार्मिक विसंवाद व बेबनावाच्या विरोधात ठामपणे उभे राहावे लागेल. सर्व जगात बहुसंख्यांकवाद बोकाळतो आहे. त्याला रोखण्याचे काम आपल्याला करावे लागेल. गरीब शोषित माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी कटिबध्द रहावे लागेल.
जगी जे आर्त अती पतीत,
जगी जे दिन पद दलित,
तया जाऊन उठवावे,
जगाला प्रेम अर्पावे.
हे काम आपल्याला करायचे आहे. साने गुरुजींनी बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो हे स्वप्न पाहिले होते ते आपल्याला पूर्ण करायचे आहे. हे स्वप्न पूर्ण करणे हेच त्यांना खऱ्या अर्थाने अभिवादन ठरेल.

