महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर –रविवारी आळंदी येथे श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा दरम्यान वारकऱ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याविरोधात सोमवारी सकाळी संगमनेरमध्ये शिवसेनेने (ठाकरे) शिंदे-फडणवीस सरकारविरोधात निषेध आंदोलन केले.
शिवसेना वारकरी भजनी मंडळाच्यावतीने शिंदे-फडणवीस सरकारच्या निषेधार्थ व राजीनामाच्या मागणीसाठी संगमनेर बस स्थानकासमोर हे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेना शहर प्रमुख अमर कतारी यांनी वारकऱ्यांच्या वेशात पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह केलेल्या या आंदोलनाने लक्ष वेधून घेतले होते.
रविवारी आळंदी येथील श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यादरम्यान वारकरी व पोलिसांमध्ये मंदिर प्रवेशावरून वाद उपस्थित झाला व त्याही पुढे जाऊन भगवा ध्वज खांद्यावर घेऊन हरीनामाचा गजर करणाऱ्या वारकऱ्यांवर पोलिसांनी अमानवीपणे लाठीचार्ज केला.
ह्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला असून घटनाबाह्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कावेबाज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहखात्याने थोडी तरी लाज बाळगून तात्काळ राजीनामा द्यावा तसेच संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी शहरप्रमुख अमर कतारी यांनी निषेध व्यक्त करतांना केली.
गेल्या शेकडो वर्षापासून वारकरी हे दिंडी, पालखी घेऊन पंढरपूर येथे श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी जातात. हि परंपरा प्राचीन असून मुघल काळात देखिल कधी त्यात खंड पडला नाही. मात्र फडणवीस सत्तेत असतांना मागच्या वेळीही वारकरी आणि वारीबाबत संभ्रमावस्था उपस्थित झाली होती. आत्ताही वारकऱ्यांवर लाठी हल्ल्याचे पुरावे असतांना गृहमंत्री असलेले फडणवीस हे वारकऱ्यांवर लाठीहल्ला झाला नसल्याचे मान वर करून सांगतात. त्यांना जनाची नाही तर किमान मनाची देखिल लाज वाटत नाही का? असा संतप्त सवाल कतार यांनी केला आहे.
या घटनाबाह्य सरकारने यावर तात्काळ वारकरी संप्रदायाची माफी मागावी अन्यथा या सरकारला महाराष्ट्राच्या रोषाला सामोरे जावे लागेल असे तालुका प्रमुख भाऊसाहेब हासे यांनी म्हटले असून यावेळी संगमनेर पठार भाग तालुकाप्रमुख संजय फड, संपर्कप्रमुख नरेश माळवे, महिला आघाडी तालुकाप्रमुख शितल हासे, संदीप रहाणे व युवा सेनेचे गोविंद नागरे यांनी आपल्या भावना व्यक्त करत सरकारचा निषेध नोंदविला.
शहर शिवसेनेच्यावतीने वारकऱ्यांसोबत दिंडी काढून भजन-कीर्तन करत संगमनेर शहर बस स्थानकासमोर शिंदे फडणवीस सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत अनोख्या पद्धतीने सरकार व प्रशासनाचा निषेध करण्यात आला. यावेळी शहर व तालुक्यातून अनेक शिवसैनिक, युवासैनिक, महिला पदाधिकारी उपस्थित होते.
यात उपशहर प्रमुख इम्तियाज शेख, दीपक वन्नम, वेणुगोपाल लाहोटी, शहर संघटक दीपक साळुंखे, शहर कार्याध्यक्ष अजीज मोमीन, विभागप्रमुख विजय भागवत, संभव लोढा, युवासेना उप जिल्हाप्रमुख वैभव अभंग, तालुकाप्रमुख अक्षय गुंजाळ, युवासेना शहर प्रमुख गोविंद नागरे, युवासेना विधानसभा प्रमुख अमोल डुकरे, उप तालुकाप्रमुख जनाभाऊ नागरे, सागर भागवत, मार्केट कमिटी सदस्य विजय सातपुते, उपशहर प्रमुख अक्षय गाडे, महिला आघाडीचा संगीता गायकवाड, आशा केदारी, ग्राहक संरक्षण कक्षाचे शहर प्रमुख योगेश बिचकर, तालुकाप्रमुख सदाशिव हासे, एस. पी. राहणे, सुदर्शन इटप, घुलेवाडी गटप्रमुख रवी गिरी, शाखाप्रमुख नितीन अनाप, उप तालुकाप्रमुख संतोष कुटे, युवा सेनेचे शोएब शेख, विभागप्रमुख माधव फुलमाळी, मुकेश कचरे, प्रशांत खजुरे, लिंगमूर्ती चिंता, भजनी मंडळ अर्जुन आमले, राजेंद्र लोणारी, माधव आवसक, चंदू भागवत तालुक्यातील वारकरी-टाळकरी उपस्थित होते.

