महाराष्ट्र संवाद न्यूज
अहमदनगर – आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ सेवन विरोधी दिनानिमित्त १२ ते २६ जूनपर्यंत ‘नशामुक्ती भारत पंधरवडा’ जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची ऑनलाइन बैठक घेत जिल्हाभर व्यापक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. त्याअनुषंगाने जिल्ह्यात महाविद्यालयातील समान संधी केंद्रांमार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा समाज कल्याण अधिकारी राधाकिसन देवढे यांनी दिली आहे.
भारत सरकारने अंमली पदार्थाच्या धोक्याविरुद्ध लढण्यासाठी ‘ड्रग्स मुक्त ‘भारत’ चा संकल्प केला आहे. त्याअनुषंगाने ‘नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने १२ ते २६ जून या कालावधीत ‘नशामुक्त भारत पंधरवडा’ जाहीर करून त्याबाबत सर्व राज्यांना अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.
अंमली पदार्थाच्या दुष्परिणामाबाबत व धोक्यांविरुद्ध लढण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणे हा ‘नशामुक्त भारत’ पंधरवडा कार्यक्रमाचा उद्देश आहे. आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य पदार्थ सेवन विरोधी दिनाचे (२६ जून) औचित्य साधत जनजागृती मोहीम, रॅली, चर्चासत्रे, कार्यशाळा इ-प्रतिज्ञा मोहिमा कार्यक्रमाच्या माध्यमातून नशामुक्त भारत अभियान राबवण्यासंदर्भात सूचित केले आहे.
या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदेच्या जिल्हा समाजकल्याण अधिकारी व समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्तांनी नशामुक्त भारत अभियान समिती व व्यसनमुक्ती केंद्राच्या सहाय्याने समयबद्ध कार्यक्रमांतर्गत आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य सेवन विरोधी दिन व नशामुक्त भारत पंधरवड्याचे (दि. १२ ते २६ जून) आयोजन विद्यापीठ, महिला मंडळे, युवक मंडळे, स्थानिक स्वयंसेवी संस्था अनुदानित संस्था, सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च महाविद्यालये, अपंग संस्था, आश्रमशाळा, जिल्हा परिषद पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, स्थानिक कार्यकत्यांच्या सहभागाने जनजागृती मोहीम, रॅली, चर्चासत्रे, कार्यशाळा, इ-प्रतिज्ञा मोहिमांचे आयोजित करण्याचे निर्देश राज्यातील समाज कल्याण विभागातील सर्व अधिकाऱ्यांना ऑनलाइन बैठकीद्वारे दिले आहेत.
बैठकीस समाजकल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्यासह राज्यातील सर्व प्रादेशिक उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, जिल्हा समाज कल्याण अधिकारी उपस्थित होते.
अभियानाबाबत संबंधितांना सूचना…
सर्व शाळा व महाविद्यालयांत समान संधी केंद्र सुरू करण्यात आलेले असून या केंद्रांचे अध्यक्ष प्राचार्य आहेत. या केंद्रांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवल्या जातात. या केंद्रांच्या अध्यक्षांची बैठक घेऊन त्यांना अभियानाबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यस्तरीय नशाबंदी मंडळाच्या संघटकांसोबत जिल्ह्यातील समान संधी केंद्रामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती देवढे यांनी दिली.

