बुधवारी सकाळी पर्यावरण प्रेमींनी पुन्हा जाळल्या वाळूच्या गोण्या!
अनंत पांगारकर | महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वाळू तस्करी रोखण्यासाठी राज्यात नवे वाळू धोरण आणले असले तरी या धोरणाला तिलांजली देण्याचे काम त्यांचे विशेष लक्ष असलेल्या संगमनेर शहरात होत आहे. वाळू धोरणाची पायमल्ली होत असताना संगमनेरमधील महसूलचे अधिकारी नेमके करतात तरी काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
शहरातून वाहणाऱ्या प्रवरा नदीतून वाळू तस्करी सुरू असल्याचा प्रकार पर्यावरण प्रेमींनी बुधवारी सकाळी पुन्हा एकदा समोर आणला आहे. प्रवरा नदी परिसरात गंगामाई घाटावर फिरायला जाणाऱ्या पर्यावरण प्रेमींनी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास नदी काठावरील पायऱ्यांवर वाळूने भरलेल्या गोण्या रिकाम्या करत त्या पेटवून दिल्या. तीन-चार महिन्यापूर्वी या पर्यावरण प्रेमींनी केलेले आंदोलन ताजे असतानाच आता पुन्हा नदीपात्रातून रात्रंदिवस वाळू तस्करी सुरू असल्याचे समोर आले आहे. यामुळे संगमनेरचा महसूल विभाग याकडे किती गांभीर्याने बघतो हे लवकरच स्पष्ट होईल.
विशेष म्हणजे या गंगामाई घाट परिसरात सकाळ संध्याकाळ दररोज मोठ्या संख्येने नागरिक फिरण्यासाठी येत असतात. या नागरिकांसमोरूनच वाळू तस्करी देखील जोमात सुरू असते. कोणी जाब विचारण्याचा प्रयत्न केला तर वाळू तस्करांकडून त्याला दादागिरी केली जाते. वाळू तस्करी करणाऱ्या भरधाव वाहनांमुळे अपघात देखील घडलेले आहेत. शिवाय हा केवळ संगमनेरचाच प्रश्न नसल्याने राज्यातील वाळू तस्करीला आळा घालण्यासाठी महसूल मंत्र्यांनी नवे वाळू धोरण आणले असले तरी त्याचा फारसा फायदा होत असल्याचे दिसत नाही. या धोरणाला तिलांजली देत वाळू तस्कर वाळू तस्करी करतच आहे.
संगमनेरच्या प्रांताधिकारी आणि तहसीलदार पदाची सूत्रे काही दिवसांपूर्वीच अमरावती विभागातून बदलून आलेल्या अनुक्रमे शैलेंद्र हिंगे व धीरज मांजरे यांनी स्वीकारली असली तरी आत्तापर्यंतच्या त्यांच्या कार्यकाळात वाळू तस्करांवर ठोस कारवाई झाल्याचे ऐकिवात नाही. पालकमंत्री असलेल्या महसूलमंत्र्यांच्याच धोरणाची अंमलबजावणी त्यांचे विशेष लक्ष असलेल्या संगमनेरमध्येच होताना दिसत नाही.
त्यामुळे या वाळू तस्करीत नेमका कोणाचा आशीर्वाद आहे. वाळू तस्करीत महसूलच्या अधिकारी मोठ्या प्रमाणात आर्थिक हप्तेखोरी करत असल्याचे आरोप नागरिकांमधून नेहमीच होताना दिसतात. त्यामुळे वाळू तस्कर वाळू तस्करी करणार… नागरिक आंदोलन करणार आणि महसूल प्रशासन फक्त हप्तेखोरीच करणार का? असा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे. हे चक्र जर असेच सुरू राहणार असेल तर येथील नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही.

