समनापुर येथे दूध संघाच्या मेडिकल शुभारंभ
महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – तालुक्यात दररोज सात लाख लिटर दूध उत्पादित होत असून साखर कारखाना व दूध संघामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मजबुती मिळाली आहे. संगमनेरचे चांगले वातावरण काहींना पहावत नाही, हे अत्यंत दुर्दैवाचे आहे. संगमनेर तालुक्याचा विकास व प्रगतीमुळे राज्यात सन्मान होत असल्याचे गौरवोद्गार काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले.
समनापुर येथे दूध संघाच्यावतीने ‘राजहंस मेडिकल’च्या शुभारंभ प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी दूध संघाचे चेअरमन रणजीतसिंह देशमुख होते. तर व्यासपीठावर ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर, संचालक विलास वर्पे, संतोष मांडेकर, डॉ. प्रमोद पावसे, सोमनाथ जोंधळे, सरपंच कमलताई बर्डे, भास्कर शरमाळे, पोलीस पाटील गणेश शरमाळे, भाऊसाहेब शरमाळे, महेश शरमाळे, बाजीराव शरमाळे, मोहनराव शरमाळे, स्वाती शरमाळे, राजेंद्र गुंजाळ, रवींद्र गुंजाळ, कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिलारी आदी उपस्थित होते.
थोरात म्हणाले, सततच्या विकास कामांमधून संगमनेर तालुका राज्यात वैभवशाली ठरला आहे. विकास, प्रगती व चांगले वातावरण यामुळे संगमनेरचा राज्यात सन्मान होतो आहे. मात्र हा लौकिक काही लोकांना पहावत नसल्याने ते वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत अशा प्रवृत्ती आपण ओळखल्या पाहिजे.
अनेक दिवसांच्या प्रयत्नातून निळवंडेचे पाणी दुष्काळी भागात आले. यामुळे तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले मात्र या सरकारला जनतेचा आनंद पहावत नाही, त्यांनी घाईघाईने पाणी बंद केले. ते संगमनेर तालुक्यात बिघडवायला येतात आपण मात्र तिकडे घडवायला गेलो. तालुक्यातील व राज्यातील जनतेचा मोठा विश्वास आपल्यावर असून हा संगमनेर तालुक्याचा सन्मान आहे.
दूध संघाने कायम शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय घेतली असून कोरोनाच्या काळात सर्व बंद असताना दूध मात्र चालू होते. आपल्या संघाने कायम शेतकऱ्यांना मदत केली असून खाजगी दूध संघामध्ये फक्त फायद्यासाठी शेतकऱ्यांकडे येतात.
तालुक्याची शांतता सुव्यवस्था व चांगले वातावरण टिकवण्यासाठी आपल्या सर्वांना एकजूटीने काम करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले
रणजीतसिंह देशमुख म्हणाले, आमदार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारी दूध संघाची वाटचाल सुरू असून दूध उत्पादन वाढवताना खर्च कमी व्हावा, यासाठी राजहंस मेडिकलच्या माध्यमातून कमी दरात औषधी उपलब्ध करून दिली जात आहे. मुक्त संचार गोठा, मूरघास हे नवनवीन प्रकल्प राबवले जात असून लसीकरणासाठी ही मोठे काम केले जात आहे. खाजगी दूध संघ नफेखोरी करण्यासाठी काम करतात तर सहकारी दूध संघ हा शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी काम करत असल्याचे त्यांनी म्हटले.
यावेळी भास्कर शरमाळे, गणेश शरमाळे, यांची भाषणे झाली. समनापुरमधील नागरिक, महिला, युवक व दूध उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

