महाराष्ट्र संवाद न्यूज
सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जयहिंद लोक चळवळीच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या राज्यभरातील युवा शेतकऱ्यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान केला जाणार आहे. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त या सोहळ्याचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी दिली.
पुरस्कारासाठी कृषी क्षेत्रातील तसेच कृषी पूरक व्यवसाय (शेळीपालन, कुक्कुटपालन, गोपालन, कृषी प्रक्रिया क्षेत्र व इतर कृषी अंगीकृत व्यवसाय) यामध्ये उत्कृष्ट नियोजन करून दिशादर्शक प्रकल्प केलेल्या शेतकऱ्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
देशात आजही सुमारे 55 टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट असते. निसर्गाची अनियमितता, कधी अतिवृष्टी, तर कधी दुष्काळ असे सतत चाललेले दृष्टचक्र व काही चुकीची कृषिधोरणे, विशेषतः निर्यातीचे धोरण (भावाची कधीही शाश्वती नसणे) अशा विविध संकटाना शेतकरी सतत तोंड देत असतो. घटती उत्पादकता व वाढता उत्पादन खर्च यामुळे देखील शेतीचे अर्थकारण सातत्याने बिघडत चाललेले आहे. तथापि कृषी क्षेत्रात काही ठोस उपाययोजना केल्यास शेती आपले बलस्थान होऊ शकते असे मत आमदार तांबे यांनी व्यक्त केले.
राज्याचे माजी महसूलमंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली, जयहिंद लोक चळवळीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुधीर तांबे यांच्या माध्यमातून कृषी क्षेत्रासह सुदृढ ग्राम, क्रीडा, आरोग्य, उद्योग व स्वयंरोजगार, वाचन चळवळ यांसारख्या अन्य 15 क्षेत्रात देखील जयहिंद लोक चळवळीचे काम सुरू आहे.
आपण समाजाचे काहीतरी देण लागतो, सुदृढ समाजाच्या निर्मितीचे आपण भागीदार बनले पाहिजे या भावनेने आमदार थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी 22 वर्षांपूर्वी जयहिंद लोक चळवळीची स्थापना केली.

