महाराष्ट्र संवाद न्यूज
अकोले – महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा १० वी, १२ वी तसेच स्पर्धा परीक्षा गुणवंत विद्यार्थी गौरव हा त्यांच्या भविष्यासाठी प्रेरणा देणारा आहे. आपल्या पुढील भविष्यासाठी गौरव रूपी ऊर्जा घेवुन हे पुरस्कारार्थी तालुक्याचे व देशाचे नाव उज्ज्वल करतील, असे प्रतिपादन अकोल्याचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी केले.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी गौरव समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ. विश्वास आरोटे होते. साईबाबा संस्थानचे विश्वस्त डॉ. जालिंदर भोर, तहसीलदार सतिष थेटे, गटशिक्षणाधिकारी जालिंदर खताळ, अमृतसागर दुध संघाचे कार्यकारी संचालक दादाभाऊ सावंत, पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र विभागीय सचिव अनिल रहाणे, जिल्हाध्यक्ष राजेश जाधव, प्रसिध्दी प्रमुख भाऊसाहेब वाकचौरे, पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सुभाष डोके, अध्यक्ष अशोक उगले, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुनिल धुमाळ, सचिव तुकाराम कानवडे, सरपंच राजेंद्र गवांदे , सरपंच संतोष आंबरे, माजी सरपंच बाबासाहेब उगले, लिंगदेव ग्रामपंचायत सदस्या कल्पनाताई फापाळे या मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह, प्रशस्ती पत्र व शालेय साहित्य देवून गौरविण्यात आले. प्राचार्य दिलीप रोंगटे, मुख्याध्यापक गोपिनाथ हाडवळे, मुख्याध्यापक अशोक नेरकर यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.
आ. लहामटे म्हणाले, गुणवंतांच्या पाठीवर गौरवरुपी थाप टाकून पत्रकार संघ अतिशय महत्वाची भूमिका बजावत आहे. पत्रकार संघ सामाजिक बांधिलकी जपून आपले कार्य करत आहे. पण आपले आई वडील, शाळा गाव, तालुका व देशाचे नाव उज्ज्वल करण्याचे काम यापुढे आपल्याला करायचे असल्याचे आहे. १३ ते २१ या वयात मुला मुलींपुढे अनेक प्रलोभने येत असतात पण यातून तावून सुलाखून बाहेर पडला तर तो नक्कीच यशस्वी होईल. आपल्या आई वडील व शाळेचे नाव कमी होणार नाही असे कोणतेही काम करू नका असे आवाहन त्यांनी केले.
डॉ. भोर यांनी आषाढी एकादशी निमित्ताने पत्रकार संघाने कार्यक्रमाचे आयोजन केले त्यामूळे पंढरपूरला न जाता अकोले हेच पंढरपूर व सर्व विद्यार्थी शिक्षक व पत्रकार संघाचे पदाधिकारी यांच्या रूपात पांडुरंग भेटीचा आनंद भेटल्याचे प्रतिपादन केले. विद्यार्थ्यांनी शिक्षकी ज्ञानाबरोबरच संस्कार व अध्यात्माचाही अंगिकार करावा असा आशावाद व्यक्त केला.
गटशिक्षणाधिकारी खताळ यांनी तालुका आदिवासीं असूनही शैक्षणिक गुणवत्तेत आज अव्वल स्थानी असल्याचे सांगितले. पत्रकार संघाचे कार्य प्रेरणादायी असून शिक्षण विभागास पूरक काम होत असल्याचे सांगितले.
विश्वास आरोटे यांनी पत्रकार संघ दरवर्षी राज्यभरात दहावी बारावी तसेच एमपीएससी, यूपीएससी, इतर स्पर्धा परीक्षा मधील गुणवंतांचा सत्कार करत असतो. अकोल्यातील कार्यक्रम हा ग्रामीण आदिवासी भागातील असूनही राज्याला दिशादर्शक आहे. सर्व गरजू विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके, दप्तर, रेनकोट, छत्री यांचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी विठुरायाच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
अनिल रहाणे यांनी पत्रकार संघाचे कार्य विषद केले. स्वागत व पाहुण्यांचा सत्कार भाऊसाहेब वाकचौरे व अशोक उगले यांनी केले. सूत्रसंचालन कार्याध्यक्ष दत्ता जाधव, सचिन लगड यांनी तर आभार प्रविण धुमाळ यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष हरिभाऊ फापाळे, ललित मुर्तडक, वसंत सोनवणे, हल्ला विरोधी समिती जिल्हा प्रमुख संतोष साळवे, शंकर संगारे, खजिनदार सुरेश देशमुख, निखिल भांगरे, जगन्नाथ आहेर, भागवत खोल्लम, दत्तू जाधव, सुनिल शेणकर, दत्ता हासे, ओमकार अस्वले, सुनिल आरोटे, आविष्कार सुरशे यांनी प्रयत्न केले.

