रविवार विशेष | प्रवीण पूरो
राज्य भाजपचे सर्वेसर्वा, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांनी घेतलेली मुलाखत पाहण्याची संधी मिळाली. एका होयब्याने दुसर्या सांगकाम्याची घेतलेली मुलाखत म्हणून या मुलाखतीकडे पहावं लागेल. विरोधकांना सातत्याने दोष देणार्या संपादकाच्या या मुलाखतीला कोणीही गंभीरपणे घ्यावं अशी परिस्थिती नसली तरी फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात अनैतिकता आल्याचं मान्य केलं आणि या अनैतिकतेचा आपण वेळोवेळी आसरा घेतल्याचं कबुल केलं. आपण राजकारणात अनैतिक वागलो, हे इतर वेळा शुचिर्भूततेचा आव आणणार्या फडणवीसांनी स्वत:च कबुल केलं हे बरं झालं.
अनैतिक राजकारणी असा ठपका त्यांच्यावर इतर कोणी लावला असता तर त्यांच्या हुजर्यांनी त्या व्यक्तीला सोलून काढलं असतंच पण फडणवीसांनी त्या व्यक्तीच्या चौकशीसाठी यंत्रणांनाही कामाला लावलं असतं. आता मात्र तसं होणार नाही, अशी अपेक्षा ठेवूया. तर राजकारणात टिकायच असेल तर अनैतिकता जोपासावी लागत असल्याचं फडणविसानी जे जाहीर केलंय ती अनैतिकता म्हणजे काय, ती कोणत्या थराची असली पाहिजे, तिची पातळी कशी असावी, ती कठोर असावी आणि तिचा वापर कधी करावा याचे परीमाणही फडणवीसांनी जाहीर करायला हवे होते. कारण राज्याच्या राजकारणात सर्वाधिक अनैतिकता ही फडणवीसांनीच वापरात आणली. तिचा अनन्वित वापर केला आणि आपल्या पक्षांतर्गत आणि पक्षाबाहेरीलही स्पर्धकांना कायमची अद्दल घडवल्याचं दिसेल. याला केवळ साधी अनैतिकता म्हणता येणार नाही.
पुरोगामी महाराष्ट्रातील राजकारणात त्यांनी अघोरी अनैतिकता जोपसली असंच म्हणता येईल. राज्यातल्या राजकारणाचा स्तर इतका खाली कधीच आला नव्हता. म्हणजे मला मुख्यमंत्री होऊ दिलं नाही म्हणून मी बदला घेतला अशी बदलाची भाषाही महाराष्ट्रातल्या कोणी नेत्याने केल्याचं ऐकिवात नाही. एखादा नारायण राणेंसारखा अपवाद वगळता असा विक्षिप्तपणा आजवर कोणी केला नाही. राज्याच्या राजकरणात आणि समाजकारणात अनेक सम्राट होऊन गेले. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खानदेशात अशा अनेकांनी आपली कारकीर्द गाजवली. ते इतके उत्तुंग होते की त्यांच्याविना कोणाचं काही चालत नसे. त्यांनीही अशी बदलाची भाषा वापरल्याचं आठवत नाही.
राजकरणात अनैतिकता असते असं फडणवीसांना कधी कळलं, की ते आता याविषयी बोलू लागलेत. यापूर्वी अनैतिकता नव्हती? होती, पण तिचा स्तर फडणवीसांनी केला इतका खालचा नव्हता. एखाद्या राजकीय पक्षातल्या नेत्याला आपल्या पक्षात घेण्याचा प्रघात अनंत काळचा आहे. एखाद्याचा पक्ष आपल्यात विलीन करण्याची पध्दत पूर्वांपार होती. एखाद्या पक्षाला सुरुंग लावण्याची क्रिया या होतच होत्या. तेव्हा कोणी नैतिकतेचा बाऊ केला नव्हता. त्यासाठी तशी कारणंही असायची. हे सगळ्याच पक्षात घडायचं. पण त्यात बदलाची भावना नसायची. गेल्या घरी सुखी राहा.. असं ज्यांना सोडून गेले ते म्हणायचे. आज असल्या कारणांचा मागमूस नाही. सारेजण एकजात भाजपच्या चाकर्या करायचा निर्णय घेतात. कोणी काँग्रेसमध्ये सामील झाला, राष्ट्रवादीत गेला, सेनेत रुजू झाला, अशा बातम्या अगदीच अपवादाने येतात. सारा खेळ जणू भाजपमध्येच सुरू आहे, असंच जणू चित्र आहे. यातला एकही नैतिकतेच्या मार्गाने भाजपात जात नाही, हे उघड सत्य कोणी नाकारणार नाही.
‘पार्टी विथ डिफरन्स’ म्हणून आजवर ढोल बडवणार्या भाजपच्या सगळ्याच नेत्यांनी आता आपण अनैतिकतेच्या मार्गावरचे भागीदार आहोत असं जाहीर करायला पाहिजे. डिफरन्सेस वगैरे आता बोलायच्याही गोष्टी राहिलेल्या नाहीत, हे त्यांनी कबुल केलं पाहिजे. उगाच ताकाला जाऊन भांडं लपवण्याचे उद्योग भाजपच्या नेत्यांनी करू नयेत. त्या पक्षाच्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या राजकरणाला वेश्येच्या दारी नेऊन ठेवलंय. ती तर स्वत:ला गहाण ठेवून पैसे कमवत असते, हे दुसर्याला गहाण ठेवत स्वत:ची कमाई करत आहेत.
नैतिक आणि अनैतिकतेच्या गोष्टी सांगणार्या फडणवीसांना सत्तेची इतकी लालसा आहे की ते कोणत्याही थराला जाऊ शकतात, हे जगाने पाहिलंय. एखाद्या पक्षाचं अस्तित्व त्या पक्षाचं नव्हतंच असं दाखवायला किती धारिष्ठ्य लागतं. ज्या पक्षाला सोबत घेत पाच वर्षांची सत्ता भोगली. केवळ भोगली असं नाही तर मुख्यमंत्री म्हणून तिचा उपभोग घेतला ती सत्ता मुळ शिवसेनेच्या सहकार्याशिवाय मिळाली नसती, हे उघड सत्य जो माणूस नाकारतो त्याला राजकरणात किती महत्व द्यायचं याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. राज्याचा मुख्यमंत्री कायम मीच असला पाहिजे, ही पराकोटीची आसक्ती झाली. आपल्या सोबतीच्या सहकार्यांचा जो विचार करत नाही, तो अधिकार त्यांना देत नाही. ते स्पर्धेत आहेत म्हणून त्यांना खड्यासारखं दूर करतो ती व्यक्ती दुसर्या पक्षाचा विचार करेल, असं मानणंही खुळेपणाचं होय.
संविधानाची चर्चा करायची पण ती आपल्यासाठी सोयीची असेल तेव्हा, इतरांना त्याचा फायदा मिळणार नाही, असं आपमतलबी राजकारण करून फडणवीसांनी राजकरणात स्वत:ची पत कमी करून घेतली आहे. दुर्देवाने मोदींप्रमाणे राज्यातले नेते फडणवीसांना हे सांगत नाहीत. सल्ले देऊन स्वत:ला खड्डयात घालण्याची कोणाची तयारी नाही. कारण पक्षाच्या राज्यातील सार्या नाड्या या फडणवीसांच्या हाती आहेत. पक्षासाठीही देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र यामुळे ब्र काढण्याची हिंमत कोणाची नाही. नाड्या सैल होतील तेव्हा मागले सारे सोडून गेलेले असतील, अशी स्थिती येईल तेव्हाच नेत्यांचे डोळे उघडतील.
नैतिकता आणि अनैतिकता कशाने खायची असते, याचा विचार फडणवीसांनी यापुढे करायला हवा. तो न करता पुढेही तसंच वागण्याचा प्रयत्न केल्यास सर्वाधिक नुकसान फडणवीसांचं होईल, हे सांगायला नको. राज्याच्या राजकरणात ईडीचा आणि सीबीआयचा अनन्वित वापर करून ज्या पध्दतीने अत्याचाराचा डोंगर उभा केला तो पाहाता फडणवीस यांनी केवळ अनैतिकता जोपासली असं नाही त्यांनी त्यातला अघोरीपणा वापरात आणला. ज्यांच्याविरोधात ईडीची कारवाई करण्यात आली त्यांच्या नातलगांची भेट फडणवीस यांनी एकदा घ्यावी. मी नाही त्यातली, असं सांगणार्या फडणवीसांची कोणत्या शब्दात हे नातलग मोजणी करतात हे त्यांच्या लक्षात येईल. महाराष्ट्राच्या राजकरणात हयात घालवलेल्यांना कोणी शब्द वापरणार नाहीत, असे दोष फडणवीसांच्या वाट्याला येतात. याला अनैतिकता जसं कारण आहे तसं फडणवीसांमध्ये रुजलेला खोटेपणा कारणीभूत आहे. ते हातोहात खोटे बोलतात.
शिवसेनेला मुख्यमंत्री पदाचा शब्दच दिला नाही, अजित पवारांबरोबरील सत्तेच्या वाट्यात शरद पवारही होते, खडसेंवर 30 कोटी कमाईचा आरोप अशा असंख्य खोटेपणाच्या गोष्टी महाराष्ट्राच्या राजकरणात फडणवीसांनी खपवल्याच पण अनील देशमुख, नवाब मलिक यांनाही त्यांनी खोटेपणाचा शिक्का मारून तुरुंगात डांबायला लावलं.
एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले याचं आपल्याला काहीच वाटलं नाही, असं सांगणारे फडणवीस आता निवडणूकही शिंदेंच्या नेतृत्वाखाली लढणार आहेत. सर्वच बालबुध्दीचे असावेत असं फडणवीसांना वाटत असल्याचेच हे परिणाम होत. उध्दव ठाकरेंनी तर मुख्यमंत्रीपदाची उघड मागणी केली होती. शिंदे तर अचानक बनलेले मुख्यमंत्री आहेत. गोहाटीपासून गोव्यापर्यंतची दरमजल आपण केली आणि मुख्यमंत्री पदाची खुर्ची शिंदेंनी लाटली हे फडणवीसांना रुचलं हाही नैतिकतेचा पराभव होता, हे फडणवीस यांनी लक्षात घ्यायला हवं.

