महाराष्ट्र संवाद न्यूज
मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणात आज नवा धक्कादायक ट्विस्ट बघायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पाडत विरोधी पक्ष नेते अजित पवार आज राज्याच्या शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होत उपमुख्यमंत्री झाले. त्यांच्यासोबत नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. पहाटेच्या शपथविधीनंतर यावेळी त्यांनी भर दुपारी बंडाचा झेंडा फडकविला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात होती. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांकडून आपली एकजूट कायम असल्याचे वारंवार सांगितले जात होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अध्यक्ष शरद पवार यांनी भाकरी फिरविण्याचा प्रयोग केल्यानंतर अजित पवार नाराज असल्याचे वारंवार समोर येत होते. अखेर पहाटेच्या शपथविधीनंतर आज पुन्हा एकदा अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पाडत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला त्यामुळे 2019 नंतर अजित पवार तिसऱ्यांदा राज्याचे उपमुख्यमंत्री झाले आहे.
गेल्या वर्षी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये मोठी फूट पाडत 40 आमदारांना सोबत घेऊन भाजपसोबत सरकार स्थापन केले होते. या सरकारची वर्षपूर्ती होत नाही तोच, आज पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ बघावयास मिळाली. या मोठ्या घडामोडीनंतर आज पुन्हा एकदा राजकारणात नवा ट्विस्ट बघावयास मिळाला.
रविवारी दुपारी राज भवनामध्ये अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची तर छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, आदिती तटकरे, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा आत्राम, अनिल पाटील व संजय बनसोडे यांनी मंत्री पदाची शपथ घेतली आहे. या सर्वांना कोणते खाते मिळते हे लवकरच समोर येईल. दरम्यान अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर आज राज्याला दोन उपमुख्यमंत्री मिळाले आहे.

