महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – रविवारचा दिवस संगमनेरकरांसाठी घातवार ठरला. दोन वेगवेगळ्या अपघातात दोघा तरुणांचा, जवळे कडलग आणि पेमगिरी येथे पाण्यात पडून दोन महिलांचा मृत्यू झाला. तर तालुक्यातील निमगाव टेंभी येथे तरुणाने गळफास घेऊन जीवन संपविण्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान या पाचही मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी बराच काळ उपलब्ध न झाल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
या संदर्भात संगमनेर तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. संगमनेर शहरातील देवी गल्ली येथील अनुकूल सत्यवान मेंढे (वय २१ वर्षे) या तरुणांचा निळवंडेजवळ झालेल्या अपघातात मृत्यू झाला. जखमी अवस्थेत मेंढे याला उपचारासाठी रात्री संगमनेरच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले होते. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या माहितीवरून संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दुसरा अपघात कोल्हार घोटी राज्य मार्गावर वडगाव पान शिवारात घडला. वडगाव पांडू नका जवळ स्वामी समर्थ मंदिरापाशी रविवारी रात्री झालेल्या या अपघातात संगमनेर तालुक्यातील कर्हे येथील अमोल गजानन सानप या तीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. त्याला देखील जखमी अवस्थेत उपचारासाठी संगमनेरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान रात्री बारा वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. खासगी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे.
संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथे पुष्पा उत्तम डुबे (वय ४२ वर्ष, रा. पेमगिरी) या महिलेचा शेततळ्यातील पाण्यात पडल्याने मृत्यू झाला. डुबे शेततळ्यात पडल्याचे लक्षात येतात त्यांना पाण्याबाहेर काढून उपचारासाठी घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले होते मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. यासंदर्भात संदीप सोमनाथ डुंबरे (रा. पेमगिरी) यांनी दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पाण्यात बुडून मृत्यू पावल्याची दुसरी घटना संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग या गावात घडली. ज्योती संतोष पाटेकर (वय ३८ वर्षे, रा. आरेवाडी, ता. कराड) असे पाण्यात पडून मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. ज्योती पाटेकर यांचा मृतदेह शशिकांत प्रभू हांडे यांच्या शेतातील विहिरीत पाण्यावर तरंगताना आढळून आला. विहिरीतून वर काढत उपचारासाठी त्यांना ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झालेला होता. याप्रकरणी शशिकांत हांडे यांनी दिलेल्या माहितीवरून तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
याशिवाय घरातील छताला असलेल्या हुकाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन युवकाने आत्महत्या केलाचा प्रकार संगमनेर तालुक्यातील निमगाव टेंभी या गावात समोर आला. अश्विन बाबुराव वर्पे (वय २८ वर्षे, रा. निमगाव टेंभी) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. गळफास घेतल्याचा हा प्रकार लक्षात येताच त्याला उपचारासाठी शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथून त्याला ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले. याप्रकरणी अमोल खंडेराव वर्पे यांनी दिलेल्या माहितीवरून तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

