महाराष्ट्र संवाद न्यूज
शिर्डी – एक रुपयात पीक विमा योजना ही राज्य शासनाने सुरु केलेली महत्त्वाकांक्षी योजना शेतकऱ्यांना दिलासा देणारी आहे. शेतकऱ्यांना अशा योजनेतून लाभ देणारे महाराष्ट्र देशातील एकमेव राज्य असल्याचे प्रतिपादन महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
राज्य शासनाने खरीप व रब्बी हंगामाकरीता सुरु केलेल्या एक रुपयात पीक विमा योजनेचा प्रसार करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या रथाचे उद्घाटन महसूलमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या रथांना हिरवा झेंडा दाखवून संपूर्ण जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना या योजनेची माहिती देण्यासाठी हे रथ जिल्ह्यामध्ये रवाना करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, उपविभागीय कृषी अधिकारी विलास गायकवाड, मच्छिंद्र थेटे, दिपक पठारे, सतिष कानवडे, अशोकराव धावणे यांच्यासह कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी, शेतकरी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
महसूलमंत्री विखे म्हणाले, यापूर्वी पीक विमा योजनेचा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागला. शेतकऱ्यांची आर्थिक लुट आणि फसवणूक झाली. या परिस्थितीमध्ये बदल करण्यासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांकरीता एक रुपयात पीक विमा योजना सुरु केली. त्याची अंमलबजावणी आता यंदाच्या खरीप हंगामापासून सुरु होत आहे. या योजनेचा कोणताही आर्थिक भार शेतक-यांवर पडणार नाही. शासनच आता विम्याची रक्कम भरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या योजनेत सहभाग घेण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वत:हून आता पुढे आले पाहिजे. हवामानातील बदल हे कृषी क्षेत्रापुढे मोठे आव्हान असल्याने आपल्या पीक उत्पादनाची सुरक्षितता वाढविण्यासाठी विमा योजनेचे संरक्षण कवच महत्वपूर्ण ठरणार आहे. शेतकऱ्यांनी कृषी कार्यालयांमध्ये संपर्क साधून या योजनेची माहिती घ्यावी. जिल्ह्यातील कृषी अधिकाऱ्यांनी गावपातळीवर जावून या योजनेचा प्रसार आणि प्रचार करुन, योजनेची माहिती शेतकऱ्यांना देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी या पीक विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी ३१ जूलै २०२३ ही अंतीम तारीख असून शेतकऱ्यांनी आपले अर्ज दाखल करण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्रामध्ये सुविधा उपलब्ध करण्यात आली असून, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालयातही संपर्क साधून योजनेत सहभाग घेण्याचे आवाहन केले.

