महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण सुरू असताना माणसा-माणसातील संवेदना हरवत चालल्या आहे. अशा स्थितीत गावोगावी ग्रंथ मंदिरे उभी राहिल्यास सुसंस्कृत समाज निर्मिती होईल, असे प्रतिपादन पुण्याच्या बार्कलेज या आयटी कंपनीचे मानव संसाधन व्हाईस प्रेसिडेंट प्रीतम देशमुख यांनी केले.
स्व. पतिंगराव देशमुख यांच्या स्मृति निमित्ताने देशमुख यांनी जवळेकडलग येथील सावरकर विचार युवा मंच संचलित स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालयास ग्रंथ भेट दिले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते ज्ञानदेव माऊली देशमुख होते. वाचनालयाचे अध्यक्ष गोकुळ खंडागळे, उपाध्यक्ष प्रताप कडलग, कार्यवाह सुनील कडलग, दिलीप कदम, श्रीमती प्रणिता देशमुख आदी यावेळी उपस्थित होते.
देशमुख म्हणाले, व्हाट्सअप, फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या जाळ्यात अडकलेल्या तरुण पिढीला दिशा देण्यासाठी वाचन संस्कृती जोपासण्याची आवश्यकता आहे. मात्र आजच्या धकाधकीच्या जीवनात पुस्तके वाचण्यासाठी लोकांकडे वेळ नाही. ही वाचन संस्कृती जोपासले जावी, यासाठी स्वामी विवेकानंद वाचनालयाने दिलेले योगदान महत्त्वपूर्ण आहे.
दिलीप कदम म्हणाले, एकत्र कुटुंब पद्धती लोप पावत चालली आहे. नातवंडांना गोष्टी सांगणारे, त्यांच्यावर संस्कार करणारे आजी-आजोबा आता दिसत नसल्याने या लहान मुलांचे बालपण हरवले आहे. आजच्या डिजिटल युगात ही मुले मोबाईल गेमच्या आहारी जात असताना या पार्श्वभूमीवर लहान मुलांवर सुयोग्य संस्कार घडविणारी पुस्तके त्यांना या ग्रंथ देणगीतून उपलब्ध करून देण्यात आली आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील महाले यांनी केले तर आभार ग्रंथपाल उज्वला महाले यांनी मानले. यावेळी भाऊसाहेब गोसावी, हिरालाल सुर्वे, डॉ. अरुण कडलग, सुखदेव मोहिते, शरद कदम आदी उपस्थित होते.

