कर्माचं फळ काय असतं, हे किरीट सोमय्या यांना आज कळून चुकलं असेल. ते कसं पचवावं याच्या चिंतेत ते गर्क असतील. ते या संकटातून सहीसलामत सुटोत, अशी सदिच्छा त्यांना आपण देऊयात. ही मराठी महाराष्ट्राची संस्कृती आहे. संकटात माणसाला मदतीचा हात द्यावा. त्याला आणखी खायित लोटू नये, आपल्या महाराष्ट्राची संस्कृती ही अशी आहे. वर्षानुवर्ष महाराष्ट्रात राहून जी किरीट सोमय्या या माणसाला कधी कळलीच नाही. कारण डोक्यात अहंकार होता महाराष्ट्राच्या बदनामीचा. महाराष्ट्राच्या बदनामीत या माणसाने इतकं टोक गाठलं की जगातला भ्रष्ट कारभार हा एकट्या महाराष्ट्रातच होत असावा आणि केवळ विरोधकच तो करत असावा, असं चित्र या माणसाने निर्माण केलं. हे करण्यासाठी भाजपने त्याला सुटं सोडलं. भ्रष्टाचाराचा मसिहा म्हणून त्याने स्वत:च्या मागे लेबल तयार केलं. त्याने राज्याला बदनामच केलं नाही, विकासाच्या गतीपासून राज्याला पारखं केलं. जिथे खातो तिथे किमान शौच करू नये, ही सामान्य अपेक्षाही किरीटने पायदळी तुडवली. ज्या महाराष्ट्राने जगायचं कसं ते शिकवलं, राजकारणाचे धडे दिले. मुंबईने त्याला घडवलं, मोठं केलं, अंगाखांद्यावर खेळवलं त्यानेच महाराष्ट्राला, मुंबईला पायाखाली घेतलं. याचा इतका अतिरेक झाला की हा माणूस कुठे तरी अडकावा, असंच ज्याला त्याला वाटू लागलं होतं. आज अडचणीत आलेल्या या माणसाला कोणा कोणाची सहानुभूती आहे, याचा शोध घेतला तर किरीट आणि त्याची पाठराखण करणार्या भाजपची खूचप अडचण होईल.
भ्रष्टाचाराचा तारणहार बनलेल्या या माणसाला महाराष्ट्रातली जनता इतकी कंटाळली की त्याची गणतीही करता येणार नाही. एखाद्याच्या शारीरिक व्यंगावर कोणी बोट ठेवू नये, पण तरीही किरीटला त्याच्या तोतरेपणाचं लेबल लावण्याइतपत लोकांची मजल गेलेली सोशल मिडियावर पहायला मिळायचं. विक्रांतच्या मदतीच्या निमित्ताने आलेलं बालंट त्याने दुर्लक्षित केलं तेव्हाच त्याला लोकमानस कळायला हवा होता. पण सत्तेने त्याला आंधळं केलं होतं. एका वृत्तवाहिनीच्या ‘किचन कल्लाकार’ नामक कार्यक्रमात एकनाथ खडसे यांनी किरीट सोमय्याला ‘बाबा सांभाळून रहा.. कधी काय होईल, सुपातून कधी जात्यात जाशील हे कोणी सांगू शकत नाही’ असा सबुरीचा सल्ला दिला होता. ज्या खडसेंनी हा सल्ला दिला त्या खडसेंनाही या माणसाने सोडलं नाही. देवेंद्र फडणवीस यांनी खडसेंना संकटात टाकलं तेव्हा भाजपचा एकही नेता त्यांच्या सोबत नव्हता. या संकटात किरीट खडसेंच्या विरोधात आघाडीवर होता.
भोसरीच्या कथित जमीन घोटाळ्यात खडसेंना अस्मान दाखवायला निघालेल्या किरीटमुळे खडसेंच्या जावयाला चक्क वर्षभर कोठडीत डांबण्यात आलं. आरोपात तथ्य नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने नमूद करत गिरीष चौधरी यांना जामीन मिळाला. भ्रष्टाचाराचे आरोप करताना किरीट हातचं राखायचा. त्यांनी केलेल्या आरोपातल्या एकाही नेत्याला शिक्षा झाली नाही. यावरून किरीट यांचं हे मिशन किती बोगस होतं याची जाणीव सर्वांनाच होती. आरोप करून स्वत:चा गल्ला भरण्याचे अनेकजणांचे हातचे उद्योग आहेत. कष्टाहून अशाच पैशात त्यांनी इमले बांधले उभे केले. सिंचन घोटाळ्यात सुनील तटकरेंनी कोट्यवधी छापले, असा धडधडीत आरोप करणार्या किरीटने त्यानंतर एकदाही तटकरेंवरील आरोपाचा पाठपुरावा केला नाही. तेव्हा या दोघांमध्ये झालेल्या डीलच्या खमंग चर्चाही आश्चर्यचकित करायच्या. छगन भुजबळ यांना अडीच वर्षांचा तुरुंगवास झेलल्यानंतर निर्दोषत्व मिळालं. ज्याने हे घडवलं त्यात किरीटचाच वाटा होता. रायगड जिल्ह्यातील कोईली गावात खरीदलेल्या जमिनीवरील सोळा कथित बंगल्यांचं प्रकरण म्हणजे किरीटच्या खोटेपणाची उघड साक्ष होय. ही जागा अन्वय नाईक यांच्याकडून खरेदी करण्यात आली त्या अन्वय नाईक यांनी आत्महत्या करण्याचं कारण मात्र किरीटने कधी कोणाला विचारलं नाही, की त्याचा पाठपुरावा केला नाही.
विक्रांतच्या बचावार्थ काढलेल्या निधीत किती जमा झाले याची माहिती लपवणार्या किरीटने ते पैसे राज्यपालांकडे जमा केल्याचं ठोकून दिलं. पण तिथेही पैसे जमा झाले नाहीत. तरीही किरीटवरील आरोप मागे घेण्यात आले. विरोधकांना सळो की पळो करून सोडणार्या या माणसाने सार्या मर्यादा पार केल्या होत्या. अनेकांची घरं उदध्वस्थ केली. अनेकांना तुरुंगात सडवलं. खडसेंच्या जावयाने खोटे आरोप लावण्यात आल्याने आत्महत्या करण्याचा विचार बोलून दाखवला. सोशल मिडियाने तर किरीटविरोधात मोहिमच उभारल्याचं दिसतं होतं. महाराष्ट्राला बदनाम करण्याचाच यामागे कट असल्याचा आरोप तेव्हा केला जात होता. तरीही ना किरीट स्वस्त बसला ना भाजपच्या नेत्यांनी त्याला रोखलं.
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली तेव्हापासून तर किरीटच्या आरोपांना घरबंधच नव्हतं. कोरोनाच्या संकटात घेण्यात आलेल्या तात्कालिक निर्णयातील अनियमितपणाचा गैरफायदा घेत त्याने मुंबई महानगरपालिका आणि पालिकेतील सत्ताधारी असलेल्या शिवसेनेवर इतके आरोप केले की यातून माणसाच्या मरणाचंही राजकारण झालं. पुणे, पिंपरी, नागपूर, ठाणे पालिकेत भ्रष्टाचाराचे आरोप झाले तिथे चौकशी न करता एकट्या मुंबई पालिकेला टार्गेट केलं जाणार असल्यास त्यामागचा हेतू न कळायला मुंबईकर थोडेच दुधखुळे आहेत?
किरीटने मागणी केली म्हणून चौकशी आणि इतरांच्या मागणीला किंमत न देणार्या यंत्रणेतील अधिकार्यांच्या कृतीने किरीट शेफारला. त्याने केलेले आरोप सर्वांनाच खरे वाटू लागले. त्याच्या लेखी लबाड समीर वानखेडे साव ठरला, मुंबईचा लुटारू परमवीर सिंग, त्याचा साथीदार सचिन वाझे योग्य ठरला. तटकरेंपासून, भुजबळांपर्यंत आणि वानखेडेंपासून वाझेपर्यंतची ही सगळी माणसं आज सत्तेसाठी किरीटच्या पक्षाला जाऊन मिळालेली आहेत. पण त्यातल्या एकानेही किरीटची बाजू घेतलेली नाही, हा किरीटच्या मागचा दुर्विलासच म्हटला पाहिजे.
अश्लील सीडी उजेडात आल्यानंतर किरीटवर होऊ लागलेल्या आरोपांची आता भाजपकडे असलेल्या गृह खात्याकडून चौकशी केली जाणार आहे. या चौकशीतून फारसं काही बाहेर येईल, यावर कोणाचा विश्वास नाही. फडणवीसांकडील गृह खात्याने याआधीही आपल्याच पक्षातील अनेकांच्या चौकशा केल्या आणि त्यात त्यांना क्लिनचिटही देऊन टाकल्या. तेव्हा किरीटवरील आरोपांचा सध्याच्या गृह खात्याकडून फारसा शोध होईल, यावर कोणाचा भरवसा नाही. पण या निमित्त होत असलेल्या चर्चांची दखल भाजपला घ्यावी लागणार आहे. भ्रष्टाचाराचे आरोप करून किरीट यांनी कमाई केल्याच्या असंख्य चर्चा सातत्याने होत आल्या. नेत्यांना ईडी आणि सीबीआय चौकशीची भीती घालायची आणि कमाई करायची हे उद्योग सर्रास सुरू होतेच. यात एकट्या किरीटचे खिसे भरले हे म्हणणं जोखमीचं होईल. ईडी आणि सीबीआयच्या संबंधितांनीही यात हात मारला असल्यास आश्चर्य वाटायला नको.
ही चर्चा इतक्यावरच थांबली असं नाही. अनेक अधिकार्यांना भीती घालून त्यांना ब्लॅकमेल करण्यात आल्याचं दबत्या आवाजात बोललं जाऊ लागलं आहे. काही महिला अधिकार्यांबाबतही असं घडलं असण्याची शक्यता जाणकारांना वाटते. स्वत:च्या अश्लील क्लिप्स स्वत:च बाहेर काढण्याचा अर्धवटपणा कोणी करत नसतो. ज्याने हे केलं त्याला किरीट याच्या कारनाम्याने हैराण केलं असेल हे उघड आहे. खासगी जीवनात असं कृत्य दुर्लक्षावं, असं आता किरीटची बाजू घेणारे सांगू लागले आहेत. यात राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाडही आहेत. त्यांनी याबाबत एकदा अनील देशमुख यांच्याशी चर्चा करावी. किरीटच्या खोटेपणाचे भोग काय होते, हे देशमुखच सांगू शकतील.
खासगी जीवन जगण्याचा अधिकार इतरांनाही असतो, हे किरीटने लक्षात घेतलं नाही. पैशांची हाव आणि सत्तेची लालसा ही माणसाला अशीच वाह्यातपणात ढकलत असते. असा वाह्यातपणा करणार्या अनेकांना भाजपने पोसलंय. त्यांना भ्रष्टमुक्त करून घेतलं. महाविकास आघाडीची सत्ता उलथून टाकण्यासाठी अघोरी मार्ग अनुसरले. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या अस्तित्वावरच घाला घालण्यात आला. याने भारतीय जनता पक्षाची कधी नव्ही इतकी हानी आधीच झाली आहे. यात किरीटच्या वाह्यातपणाची भर पडली आहे. हा वाह्यातपणा असाच सुरू ठेवला तर आगामी काळात भाजप हा बेदखल पक्ष होईल, हे सांगायला कोण्या ज्योतिषाची आवश्यकता नाही. तेव्हा अशा व्यक्तींना पक्षाच्या राजकरणापासून दूर ठेवणं यातच पक्षाचं कल्याण आहे हे लक्षात घ्यावं.