महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर तालुक्यातील तलाठ्यांच्या अनागोंदी कारभाराने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. शेतीशी निगडित नोंदीला हजारो रुपयांची मागणी केली जात असून पैसे न दिल्यास नोंद होत नाही. त्यासाठी शेतकऱ्यांना तलाठी, मंडळ अधिकारी, भूमी अभिलेख कार्यालयात हेलपाटे मारावे लागत असल्याने मानसिक व आर्थिक नुकसान होत आहे. तरी तलाठ्यांना, मंडळ अधिका-यांना सूचना करून गावागावात शिबिर आयोजित करून शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत अशी मागणी शिवप्रतिष्ठाण संघटनेचे संस्थापक, प्रदेशाध्यक्ष राहुल ढेंबरे यांनी निवेदनाद्वारे संगमनेरच्या तहसीलदारांकडे केली. यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांसह तहसील कार्यालयासमोर आंदोलनं करणार असल्याचा इशारा दिला आहे.
तालुक्याच्या ग्रामीण भागात बहुतांश गावातील तलाठी आपल्या सज्जामध्ये प्रामुख्याने हजर राहत नाहीत. तर त्यांचे हाताखालील झिरो तलाठी त्यांचे कामकाज सांभाळत असतात. यावेळी शेतीशी निगडित नोंदी अथवा अन्य कामे घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांची कामे जाणीव पूर्वक केली जात नाही. जर काम करायचे असेल तर त्यांचे अज्ञानाचा गैरफायदा घेत हजारो रुपयांची मागणी झिरो तलाठी यांचेमार्फत केली जात आहे.
ग्रामीण भागातील शेतकरी वर्गाला आपल्या सातबारावरील पोटखराबा शेतजमीन जी वहिती करत आहे. ती पोटखराबा जमीनीची नोंद घेऊन सातबारा उतारा प्राप्त करताना अनेक अडचणीना सामोरे जावे लागत आहे. यावेळी त्यांचे अज्ञानाचा गैरफायदा घेत जाणुनबुजून तलाठी, मंडळ अधिकारी, भूमी अभिलेख कार्यालय असे नाहक हेलपाटे मारायला लावत आहेत. यात शेतकऱ्यांचे मानसिक व आर्थिक नुकसान होत आहे.
तर शेतकऱ्यांकडे सातबारा उताऱ्यावर वहीतीची नोंद करण्यासाठी एकरी आठ ते दहा हजार रुपयांची मागणी झिरो तलाठीमार्फत केली जात आहे. तर पैसे न दिल्यास काम होत नाही. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या नोंदी रखडल्या आहेत. तर काही शेतकऱ्यांनी हजारो रुपये देत या नोंदी करून घेतल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांनी पैसे दिले त्यांची नोंद सर्वात आधी होते तर ज्यांनी पैसे दिले नाही त्यांच्या नोंदी बाद देखील झाल्या आहेत. त्यांना अनेक कारणे सांगत त्यांच्या नोंदी आहे त्या स्थितीत आहेत.
त्यामुळे तालुक्यातील सर्वच तलाठी, मंडळ अधिकारी यांना सूचना करून संबंधित कार्यालय स्तरावर शिबिर आयोजित करून शेतकऱ्यांना सहकार्य करून त्यांचे प्रश्न सोडवावे. अन्यथा तहसील कार्यालय संगमनेर येथे तालुक्यातील शेतकऱ्यांसह आंदोलन करण्यात येईल अशा आशयाचे निवेदन शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक प्रदेशाध्यक्ष राहुल ढेंबरे यांनी दिले. निवेदनाच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांना पाठविण्यात आल्या आहेत.
एका बाजूला तालुक्यातील शेतकरी वर्गाला वेठीस धरून लयलूट सुरू आहे. तर दुसऱ्या बाजूला तालुक्यातील विविध भागांत अवैध गौण खनिज उत्खनन, अवैध गौण खनिज वाहतूक, अवैध वाळू तस्करी मोठ्या प्रमाणात होत आहे. यावर काही प्रमाणात पोलिस प्रशासन किरकोळ कारवाई करत आहे. परंतु महसूल प्रशासनाचे आधिका-यांनी डोळ्यावर काळी पट्टी बांधली आहे. महसूल प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी मूग गिळून गप्प बसले आहे. यात काही प्रमाणात तस्करांचे या अधिकाऱ्यांशी लागेबांधे असून यात काही प्रमाणात हात लाल होत असल्याची शंका शेतकरी व्यक्त करत आहे.

