महाराष्ट्र संवाद न्यूज
मुंबई – शिंदे-फडणवीस सरकारने सत्तेत येताच महाविकास आघाडी सरकारच्या काळात घेतलेल्या विकास कामांना दिलेली स्थगिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उठविली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने प्रस्तावित केलेल्या विकास कामांचा मार्ग मोकळा झाला आहे.
महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आले सत्तेवर आल्यानंतर या सरकारने महाविकास आघाडी सरकारच्या काळात घेतलेल्या विकास कामांना स्थगिती दिली होती. अद्यापही ही स्थगिती कायम होती. स्थगिती उठवितांना दिलेल्या निधीमध्ये पुन्हा एकदा अजित दादांची ‘दादागिरी’ कायम राहिली आहे.
राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपूर्वी महत्त्वाच्या घडामोडी घडल्या होत्या. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची तर त्यांच्यासोबतच्या आठ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेत राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणली होती. नव्या मंत्रिमंडळात अजितदादांनी अर्थ खाते तर अन्य मंत्र्यांनी महत्त्वाची खाती मिळविली होती.
अर्थ खात्याची सूत्रे हाती येताच अजितदादांनी आपल्या प्रशासकीय निर्णयांचे चुणूक दाखवण्यास सुरुवात केली आहे. आपल्यासोबत सत्तेत सहभागी झालेल्या राष्ट्रवादीच्या आमदारांना अर्थमंत्री पवार यांनी भरभरून निधी दिला आहे. याशिवाय शिंदे गटाच्या आमदारांनाही निधी देत त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र शिंदे गटाच्या तुलनेत राष्ट्रवादीच्या आमदारांना सर्वाधिक निधी दिला गेला आहे. त्यामुळे यावर शिंदे गटाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची चिन्हे दिसत आहे.

